काही लहानपणीच्या जुन्या आठवणी ज्या बायको सोबत गप्पा मारताना उजळून आल्या...
ह्या आठवणी आहेत माझ्या आजोळच्या म्हणजे माझ्या आईच्या गावातील. आईचे गाव पांगारे, सासवड, पुणे येथील. हां तिकडे आता कोणी नसतं फक्त यात्रेला किव्वा अधे मधे जाणे होते.
आमचं काही लहानपण तिकडे झाले आहे. तिकडच्या आठवणी म्हणजे आमचे आप्पा ज्याच्या भोवतीच सार्या गोष्टी गुंफल्या आहेत. आप्पा म्हणजे आईचे काका जे शेतकरी होते. आता आप्पा हयात नाहीत परवा म्हणजे 17 जुनला त्यांच वर्ष श्राद्ध झाले म्हणून सगळे आठवले. आप्पा म्हणजे भारदस्त व्यक्तीमत्व कायम डोक्यावर फेटा, जॅकेट, सदरा आणि धोतर. आप्पांना पान खायची सवय त्यामुळे सोबत एक पोतडी त्यात सगळ्या गोष्टी असायच्या जसं अडकित्ता, सुपारी, चुना इत्यादी.
बैलांची माहिती अशी की कारवाण्या सर्वात मोठा रंगरूपाने अगदी गायीसारखा त्या नंतर नंद्या तोपण काळाच पण त्यात थोड वेगळेपण होते आणि शेवटी समऱ्या तो पूर्ण वेगळा म्हणजे तपकिरी रंगाचा.
वयानुसार त्यांच वागणेपण तसेच होते. कारवाण्या शांत, नंद्या थोडा शांत आणि गरम, समऱ्या तर नुसते भांडण काढायच्या कामाचा, दुसरा बैल दिसला की हा पठ्ठ्या हुंकारायला चालुच.
तशी आप्पांपुढे सगळी चांगलीच वागायची कारण आप्पांनी कधी आसूड वापरलेला आम्ही पाहिला नाही. लहानपणापासून सगळी जनावरे घर, वावर आणि पाणवठे फिरलेली त्यामुळे त्यांना बरोबर कळायचे कोणत्या वेळी कुठे जायचे ते. पाणी पाजायला आम्ही पण बर्याच वेळा आप्पांसोबत गेलो होतो. एकदा तर आम्ही असचं पाणी पाजायला गेलो होतो त्यावेळी कारवाण्याचे पुढचे पाय गाळात रुतले होते, त्याचे वय झाले असल्याने त्याला पाय निघत नव्हते. लोकांना बोलवून पायाला धरून उचलून बाहेर काढले होते.
आप्पांनी बैलांना एक सवय लाऊन ठेवली होती. शेतातील काम करुन आले की घराच्या दारात उभे राहायचे आणि जोवर भाकरी खायला मिळत नाही तोवर हालायचे नाही. तशी ती ऐकत पण नव्हती. एकदा भाकरी मिळाली की आपापल्या जागी जायची.
शेतातून निघाली की थेट घरी जायची लहानपणापासून आप्पांनी त्यांना तशी सवयच लावली होती. भले यांच्यामधील एकही बैल आता नाही पण आमच्या आठवणीत मात्र कायम राहतील. आता सगळे बदलले आहे गाव पण...
बर्यापैकी ठळक अश्या गोष्टी आठवण बनुन राहिल्या आहेत. - हर्षद कुंभार...